★माजी आमदार साहेबराव दरेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुक्याचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये समावेश करावा अशी मागणी पुन्हा एकवार आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, ज्येष्ठ नेतृत्व असलेले साहेबराव नाथुजी दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, सन १९९५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अहमदनगर येथील हिंदुह्रूदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेमध्ये आष्टी तालुक्याचा समावेश नगर जिल्ह्यामध्ये व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार हा विषय कॅबिनेट मीटिंगमध्ये घेण्यात येत असतानाच सहा महिने अगोदर युती सरकारने निवडणुका जाहीर केल्या त्यानंतर मात्र आलेल्या कोणत्याही शासनाने या मागणीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलेले नाही अहमदनगर जिल्हा हा विस्तीर्ण असून या जिल्ह्याचे विभाजन करण्याच्या हालचाली सुरू असून नवीन शिर्डी जिल्हा निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्याचा समावेश करण्यात यावा. आष्टी तालुक्यातील जनतेची ही जिव्हाळ्याची मागणी असून त्याचे प्रमुख कारण असे आहे की आष्टी तालुक्याच्या चारही दिशेला अहमदनगर जिल्ह्याची हद्द आहे त्यातील अहमदनगर शहराला कडा या गावापासून धामणगाव दौलवडगाव धानोरा लोणी या गावांसह सुमारे ५० गावांमधील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार अहमदनगर येथे होत असल्याने सतत त्या ठिकाणी जावे यावे लागते तसेच उत्तरेकडील डोंगरपट्ट्यातील सुमारे १०ते१५ गावांचा दैनंदिन व्यवहार पाथर्डी येथे होतो आष्टी शहरापासून पूर्वेकडील १८ ते २० गावे दैनंदिन व्यवहारासाठी जामखेड या मोठ्या बाजारपेठेची जोडलेले आहेत तर उर्वरित दक्षिणेकडील १० ते १५ गावे माहीजळगाव आणि मिरजगाव या मोठ्या बाजारपेठेंशी निगडित आहेत. बीड जिल्ह्यातील कोणत्याही मोठ्या गावांचा व्यापारी आणि शेतीविषयक कामांसाठी आणि इतर आर्थिक व्यवहारासाठी आष्टी तालुक्याच्या जनतेशी संबंध येत नाही. बीड हे जिल्हाचे ठिकाण असून दूर अंतरावर आहे केवळ कोर्टकचेऱ्या आणि महसुली विभागाचे आणि जिल्हा परिषद असल्यामुळे शिक्षण, आणि इतर विभागांची म्हणजे केवळ शासकीय कामांसाठीच बीडला जावे लागते. आष्टी तालुक्यातील पश्चिमेच्या शेवटच्या गावाचे अंतर बीड पर्यंतचे सुमारे १४० किलोमीटर इतके आहे त्यामुळे कोर्ट कचेऱ्या किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कामासाठी नागरिकांचे १ दिवसात काम होत नसल्यामुळे दोन दिवस त्या ठिकाणी त्यांना थांबावेच लागते. हा सर्व प्रकार गैरसोयीचा असल्याचे या निवेदनामध्ये नमूद असून पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न असलेला पश्चिम महाराष्ट्रातील अतिरिक्त होणारे आणि मराठवाडय़ातील जनतेच्या हक्काचे पाणी आष्टी तालुक्याला मिळावे यासाठी त्या भागातील जनता विरोध करते त्यामुळे आष्टी तालुक्याचा अहमदनगर जिल्ह्यात समावेश झाला तर हा विरोध कमी होऊन पाणी मिळण्याचा मार्ग सुकर होईल तसेच पुणे विद्यापीठाकडे शिक्षण घेण्याचा आष्टी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा कल असल्यामुळे अनेक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी अहमदनगर येथेच प्रवेश घेत असतात या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून भौगोलिक दृष्ट्या जवळ अहमदनगर हा जिल्हा जवळचा असल्यामुळे तसेच बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यांपैकी आष्टी तालुका हा पश्चिम महाराष्ट्राच्या सरहद्दीवर असल्यामुळे नागरिकांचे रोटी बेटीचे व्यवहार तसेच त्याच प्रकारचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरण आष्टी तालुक्यामध्ये आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आष्टी तालुक्यातील सर्वच गावातील रुग्णांवर आष्टी नंतर पुढील उपचार हे अहमदनगर येथेच होतात या सर्व बाबींचा अत्यंत गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या सोयीच्या सुविधेच्या दृष्टीने विचार करून मराठवाड्यातील असलेले विकासाचे मागासपण कमी होण्याच्या दृष्टीने आष्टी तालुक्याचा समावेश अहमदनगर जिल्ह्यामध्ये करण्यात यावा अशी विनंती ही शेवटी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.