16.9 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

अविनाश साबळेची फिनिक्स झेप ; दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र!

★कुटुंबीय म्हणतात, मुलाने देशासाठी सुवर्णधाव घ्यावी‎

★अविनाश साबळे च्या यशाबद्दल आष्टीच्या अभिमानात भर ; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव !

 

आष्टी | प्रतिनिधी

स्टीपलचेस (अडथळ्यांची शर्यत) या‎ प्रकारात 3 हजार मीटर धावून अनेक विक्रम‎ करणाऱ्या बीड जिल्ह्यातील आष्टी‎ तालुक्यातील मांडवा येथील अविनाश‎ साबळे हा लांब पल्ल्याच्या धावपटू दुसऱ्यांदा‎ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.‎ परिस्थितीने आलेले अनेक अडथळे पार‎ करत सैन्यात सुभेदार झालेल्या अविनाशने‎ आता देशासाठी सुवर्णधाव घ्यावी, अशी‎ भावना निवडीनंतर कुटुंबीयांनी व्यक्त केली.‎
आष्टी तालुक्यातील मांडवा या छोट्या‎ गावचा मुकुंद साबळे हे रहिवासी. अल्पशा‎ शेतीवर 2 मुले, एक मुलगी आणि पत्नी या‎ कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नसल्याने मुकुंद‎ यांनी 20 वर्षे वीटभट्टी कामगार म्हणून काम‎ केले. आता ते पूर्णवेळ शेती करतात.‎ अविनाश साबळे हा मोठा मुलगा.‎ मांडव्यातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक,‎ कड्यात 12 वीपर्यंतचे शिक्षण झालेल्या‎ अविनाशला परिस्थितीमुळे उच्च शिक्षण‎ घेता आले नाही. लहानपणापासूनच सैन्य‎ दलात भरती व्हायचे स्वप्न असल्याने त्याने‎ तशी तयारी केली. मैदानी चाचणीसाठी तो‎ धावण्याचा सराव करायचा. यात तो सर्व‎ उमेदवारांत पुढे असायचा. 2014 मध्ये तो‎ सैन्यात भरती झाला. सैन्य दलांतर्गत होणाऱ्या‎ धावण्याच्या स्पर्धेत सन 2015 मध्ये त्याने‎ पहिल्यांदा सहभाग घेत स्टीपलचेस या‎ प्रकारात पारितोषिक पटकावले.या मुलात‎ वेगळेपणा असल्याची जाणीव त्याचे‎ प्रशिक्षक अमरीशकुमार यांना झाली. त्यांच्या‎ मार्गदर्शनाखाली त्याने सराव सुरू केला अन्‎ त्याच्या कामगिरीचा आलेख चढताच‎ राहिला. 2020 मध्ये झालेल्या टोकियो‎ आॅलिम्पिकसाठी त्याची निवड झाली तेव्हा‎ या प्रकारात 1952 नंतर निवड होणारा तो‎ पहिला भारतीय होता. टोकियोमध्ये तो अंतिम‎ फेरीत पोहोचू शकला नाही, मात्र त्याने त्याचा‎ सर्वोत्तम वेळ तेव्हा नोंदवला होता.

★परिवाराचे आनंदाश्रू!

सध्या‎ पोलंडच्या सिलेसियामध्ये सुरू असलेल्या‎ डायमंड लीगमध्ये त्याने 8:11:63 वेळ नोंदवून‎ सहावे स्थान पटकावले असून तो 2024 मध्ये‎ होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.‎ वडील मुकुंद साबळे, आई वैशाली साबळे,‎ भाऊ योगेश यांनी त्याच्या निवडीनंतर आनंद‎ व्यक्त केला आहे.‎

★गौरव कर्तुत्वाचा!

राष्ट्रकुल पदक, अर्जुन‎ पुरस्कार मिळाला‎.बर्मिंगहॅममध्ये झालेल्या राष्ट्रकुल‎ स्पर्धेत त्याने 3 हजार मीटरच्या‎ स्टीपलचेस प्रकारात रौप्यपदकाची‎ कमाई केली होती. या प्रकारात‎ राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य मिळवणारा‎ अविनाश पहिला खेळाडू आहे.‎ यासाठी त्याला भारत सरकारने‎ अर्जुन पुरस्कार देऊन गौरवले, तर‎ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननेही‎ त्याचा युवा क्रीडा पुरस्काराने गौरव‎ केला.‎

★मंगळसूत्र विकले होते..‎

अविनाशचे वडील मुकुंद म्हणाले,‎ पहिल्यांदा अविनाश सैन्य दलात‎ भरतीसाठी गेला तेव्हा त्याची निवड‎ झाली, पण काही कागदपत्रे कमी‎ पडली. अधिकाऱ्यांनी 3 तासांचा‎ वेळ दिला. बायकोचे मंगळसूत्र‎ मोडून 3 हजार रुपये जमा केले अन्‎ कागदपत्रे मिळवली. पण वेळ‎ निघून गेली व अविनाशची संधी‎ हुकली. नंतर तो 2014 मध्ये भरती‎ झाला. आता तो सैन्यात सुभेदार‎ आहे. देशासाठी त्याच्या‎ कामगिरीचा अभिमान वाटतो.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!